

मुंबई: जून संपत आला तरी, शहराला पाणीपुरवठा करणारे तलाव अजून तहानलेलेच आहेत. तानसा तलावातील पाणीसाठा ०.०५ टक्केवर पोहचल्यामुळे या तलावातून होणारा पाणीपुरवठा येत्या दोन दिवसात बंद होणार आहे. त्यामुळे तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस लांबल्यास, मुंबईकरांवर भीषण पाणीटंचाई येऊ शकते.
मुंबई शहरात दमदार एन्ट्री मारणाऱ्या पावसाने तलावाच्या पाणलोट क्षेत्राकडे मात्र पूर्णपणे पाठ फिरवली आहे. आतापर्यंत तलाव क्षेत्रात जेमतेम १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. २०२५ मध्ये २९ जूनपर्यंत ७०० ते ८०० मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे तलावातील पाणीसाठा ही सुमारे ४० टक्के इतका झाला होता. यावेळी तलावात अवघा ६.९३ टक्केच इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाच प्रमुख तलावांपैकी नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा तलावाने दोन आठवड्यापूर्वीच तळ गाठला असून या तलावातील राखीव कोट्यातून मुंबईत पाणी आणले जात आहे.
तानसा तलावातीलही पाणी पूर्णपणे आटले असून या तलावात अवघा ६५ दशलक्ष लिटर म्हणजे ६ कोटी ५० लाख लिटर पाणी शिल्लक राहिले आहे. त्यामुळे या तलावातून होणारा पाणीपुरवठा येत्या दोन दिवसात बंद होईल, असे सांगण्यात येत आहे.
तलावातील पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)
अप्पर वैतरणा - ० (० %)
मोडक सागर - २३,८१९ (१८.४७ %)
तानसा - ६५ (०.०५ %)
मध्य वैतरणा - २२,३०८ (११.५३ %)
भातसा - ३९,६३६ (५.५३ %)
विहार - १२,४९९ (४५.१३ %)
तुळशी - १,९५२ (२४.२६ %)