

मुंबई : मुंबईत मोठ्या प्रमाणात मान्सूनपूर्व नाले सफाईचे काम सुरू झाले आहे. मात्र कंत्राटदारांकडून नेहमीप्रमाणे हातसफाई होत आहे. कांदिवलीत तर नालेसफाईचा गाळ पादचारी पुल बांधणीच्या पिलरमध्ये भरला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये खळबळ माजली असून सदर कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
कांदिवली पूर्वकडील हनुमाननगर येथे शंकर मंदिर परिसरातील सुरू असलेल्या पादचारी पुलाच्या कामात पिलर भरण्यासाठी कंत्राटदाराकडून चक्क नाल्यातील गाळ वापरला जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. पादचारी पुलाचे पिलर भरण्यासाठी सिमेंट काँक्रीट ऐवजी नाल्यातील गाळ वापरला जात आहे. यामुळे पादचारी पुलाच्या बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
हनुमाननगर येथील झोपडपट्टीतील नागरिकांसाठी असलेला पादचारी पुल गेल्या पाच वर्षांपासून धोकादायक झाला होता. मुंबई महानगरपालिकेने तो पाडून नवीन बांधण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कंत्राटदाराकडून काम सुरू आहे.
विशेष म्हणजे पिलरच्या पायामध्ये काँक्रीट न टाकता नाल्यातील गाळ टाकला जात असल्याचा व्हिडीओ स्थानिक रहिवाशांनी दै.पुढारीला पाठवला. या व्हिडीओत जेसीबीमधून नाल्यातील उपसला जाणारा गाळ बाहेर न काढता तो पिलरमध्ये ओतला जात आहे. या गाळाने पिलर भरला गेला. यामुळे आता महापालिका प्रशासन संबंधित कंत्राटदारावर काय कारवाई करणार, याकडे स्थानिकांचे लक्ष लागून राहिले आहे.