

मुंबई : शहर अस्वच्छ करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याची सर्व जबाबदारी मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. यासाठी सुरुवातीला 300 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. हे प्रशिक्षण येत्या दोन ते तीन दिवसात संपल्यानंतर कारवाईला सुरुवात होणार आहे.
मुंबई महानगरपालिकेने शहर अस्वच्छ करणाऱ्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी उपविधी प्रसिद्ध करण्यात आली आहे. परंतु क्लिनअप मार्शल नसल्यामुळे कारवाई करायची कोणी, असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु ही कारवाई मुंबई महापालिका कर्मचारीच करणार असल्याचे पालिकेचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी स्पष्ट केले.
पालिका विभाग कार्यालयाच्या क्षेत्रफळानुसार कारवाईसाठी कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित करण्यात येणार आहे. त्यानुसार एका विभाग कार्यालयाचे 10 ते 15 कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. पहिल्या टप्प्यात 300 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून दंड कसा आकारायचा व अन्य प्रशिक्षण दिले जात आहे. कर्मचाऱ्याला टॅब उपलब्ध करून दिला जाणार आहे.