

मुंबई: रिक्षा-टॅक्सी मीटर पुनर्प्रमाणीकरणासाठी मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांची धावपळ सुरू आहे. मात्र शहरातील साडेचार लाखांहून अधिक रिक्षा-टॅक्सी वाहनांसाठी केवळ २० अधिकृत केंद्रे उपलब्ध आहेत.
त्यामुळे जवळपास एका केंद्रावर सुमारे २३ हजारांहून अधिक वाहनांना मीटर प्रमाणीकरणासाठी अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. शासनाने दिलेल्या कालावधीत पुनर्प्रमाणीकरण न झाल्यास चालकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे काम बंद करून रिक्षा-टॅक्सी चालकांच्या रांगा या केंद्रासमोर लागल्या आहेत.
एमएमआरटीएने रिक्षा आणि टॅक्सींच्या दरात अनुक्रमे एक आणि दोन रूपयांची वाढ केली आहे. येत्या १ सप्टेंबरपासून रिक्षाचे किमान भाडे २७ रुपये आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे किमान भाडे ३३ रुपये होणार आहे.
त्यासाठी पुनर्प्रमाणीकर न झालेल्या रिक्षा-टॅक्सीचालकांवर रोज किमान ५० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. दंडाची कमाल मर्यादा पाच हजार रुपयांपर्यंत आहे. विशेष म्हणजे यासाठी केवळ तीन महिन्यांची मुदत परिवहन विभागाने दिली आहे.
सध्या शहरातील साडेचार लाखांहून अधिक रिक्षा-टॅक्सी वाहनांसाठी केवळ २० अधिकृत केंद्रे आहेत. या अधिकृत केंद्रावर मीटरचा जुना सील काढून नवीन भाडेदराची अद्ययावत चिप बसवली जाते. आरटीओ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत १.५ किलोमीटरची रस्ते चाचणी यासाठी घेतली जाणार आहे.
या संपूर्ण पुनर्प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेसाठी रिक्षा टॅक्सीचालकांना स्वतःचा व्यवसाय एक दिवस बंद करून केंद्राच्या रांगेत उभे राहावे लागत आहे. अशात ही पुनर्प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईल, याची शाश्वती नसल्याने चालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.