

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. उद्या, ७ मे रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत विमानतळावरील विमान सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. पावसाळ्यापूर्वीच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई विमानतळावर दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धावपट्ट्यांची विशेष तपासणी आणि देखभाल केली जाते. यावर्षी देखील ७ मे रोजी दोन्ही धावपट्ट्या ('RWY 09/27' आणि 'RWY 14/32') ६ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत धावपट्टीच्या देखभालीचे काम चालणार आहे.
या काळात धावपट्टीची दुरुस्ती, तांत्रिक तपासणी आणि पावसाळ्यात विमानांच्या सुरक्षित लँडिंगसाठी आवश्यक असणारी कामे पूर्ण केली जातील. विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या सहा तासांच्या कालावधीत कोणतीही देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे होणार नाहीत. प्रवाशांनी आपल्या उड्डाणाच्या वेळांमध्ये बदल होण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित एअरलाईनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बेस्ट प्रशासनातील नवघाणी कामगारांचा अर्थ समजत नसल्यामुळे अनेक बँकांकडून या कामगारांना कर्ज नाकारले जाते. त्यामुळे नवघाणी या शब्दाचा नेमका अर्थ शोधून त्याऐवजी दुसरा शब्द रूढ करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसेच तातडीने मान्सूनपूर्व कामांसाठी 686 नवघाणी कामगारांची बेस्टमध्ये भरती केली जाणार आहे.
बेस्ट विद्युत पुरवठा विभागात खोदकाम करणाऱ्या, रस्त्यावर केबल लाईनसाठी खड्डे पाडणाऱ्या, विद्युत उपकरणाची ने आण करणाऱ्या कामगारांना नवघाणी कामगार म्हणून ओळखले जाते. माजी कामगारांची मुले ही कामे करतात. मात्र नवघाणी या शब्दाचा अर्थ बँकेच्या व्यवहारात स्पष्ट होत नाही. त्यामुळे अनेक बँकांकडून या कामगारांना कर्ज दिले जात नाही. त्यासाठी बेस्ट समितीच्या मंगळवारच्या बैठकीत हा शब्द बदलून नवा शब्द रूढ करण्यावर चर्चा झाली.