

मुंबई : मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात 159 कोटींची तरतूद केली आहे. गेल्या अर्थसंकल्पात केवळ 76.16 कोटींची तरतूद करण्यात आली होती. या भरीव तरतुदीतुन करण्यात येणाऱ्या उपाययोजनामुळे मुंबईकरांना शुध्द हवा मिळेल, असा दावा महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केला.
या वर्षात “मुंबई एअर नेटवर्क फॉर ॲडवान्स” या प्रकल्पाच्या माध्यमातून आयआयटी कानपूर यांच्यामार्फत संपूर्ण मुंबईत 75 लो कॉस्ट सेन्सॉर्सचे नेटवर्क उभारून त्यांचे प्रचलन व परिरक्षण करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी कार्यादेश देण्यात आले असून काम प्रगतीपथावर आहे. यामुळे विशेष यंत्रणेद्वारे महानगरपालिकेला वायू प्रदुषणाचे हॉटस्पॉट ओळखण्यास मदत होईल. आयआयटी कानपूर यांनी सादर केलेल्या मूल्यांकन अहवालामुळे वायू प्रदुषण कमी करण्यासाठी धोरण आखण्यास मदत होईस, असा विश्वास आयुक्त गगराणी यांनी व्यक्त केला.
“पर्यावरण संरक्षण”, “ज्ञान व माहिती” आणि “पर्यावरण व हवामान बदल” या तीन प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून शहराच्या पर्यावरणीय आणि हवामान उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. महानगरपालिका वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बांधकाम स्थळांवर 28 मुद्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांची प्रभावी अंमलबजावणी, महानगरपालिकेच्या कामांसाठी विभाग स्तरावर पर्यावरण व्यवस्थापन योजना ( ईएमपी), मिस्टिंग, फॉगिंग मशीन, स्प्रिंकलर्स तैनात करणे आदी उपाययोजना करण्यात केल्या जात आहेत.
महानगरपालिकेने हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी लिटर पिकर यंत्रासह आधुनिक विद्युत स्वीपर व यांत्रिकी पॉवर स्वीपर तैनात केले आहेत. तसेच, अधिक रहदारीच्या ठिकाणी पिण्यायोग्य नसलेल्या पाण्याने प्रमुख रस्ते देखील धुतले जात आहेत.
मुंबई: मुंबईमध्ये पुन्हा एकदा संमिश्र वातावरण अनुभवायला मिळत आहे. अवघ्या 24 तासांमध्ये प्रदुषणामध्ये घट झाली आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) संकेतस्थळावरील माहितीनुसार, बुधवारी सरासरी एक्यूआय 110 इतका नोंदला गेला. मंगळवारच्या (162) तुलनेत वायू प्रदूषणामध्ये मोठी घट झाली. बुधवारचा एक्यूआय आठवडाभरातील सर्वात कमी आहे. 18 फेब्रुवारीला 121 इतका एक्यूआय होता. मुंबईत चक्क 22 ठिकाणचा एक्यूआय शंभरच्या खाली आला. गावदेवीतील (44) हवा खूपच चांगली होती. मालाड (82), वाळकेश्वर (84), अँटॉप हिल/चेंबूर (92), सायन/ महालक्ष्मी (95), सांताक्रुझ- पश्चिम (96), वांद्रे/वरळी/प्रभादेवी (97), जुहू/नेव्ही नगर- कुलाबा (99) भागातही नागरिकांनी थोडा मोकळा श्वास घेतला.