

मुंबई: मुलुंड डम्पिंग ग्राउंडवरील आतापर्यंत ७० लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून, त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. परंतु अद्यापही ७ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम बाकी आहे. त्यामुळे कचरा विल्हेवाट्याचे काम २१६ दिवस लांबणीवर पडणार आहे.
मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरून याचा त्रास मुलुंडकरांसह ठाणे शहरातील नागरिकांनाही सहन करावा लागत होता. त्यामुळे हे डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी नागरिकांनी मोठे आंदोलन छेडले होते.
अखेर २०१८ मध्ये हे डम्पिंग ग्राउंड कायमस्वरूपी बंद करण्यात आले. या डम्पिंग ग्राउंडवर मोठ्या प्रमाणात कचऱ्याची ढीग असून हे प्रमाण सुमारे ७० लाख मेट्रिक टन इतके होते. परंतु या सर्व कचऱ्यावरील प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
परंतु अतिरिक्त जुना कचरा उपलब्ध असल्याचे कंटूर सर्वेद्वारे निदर्शनास आले आहे. हा कचरा सुमारे ७ लाख मीटर रिटन इतका असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या अतिरिक्त कचऱ्यावर विल्हेवाट लावण्याची जबाबदारी सध्याच्याच कंत्राटदारावर सोपवण्यात येणार आहे.
या कामासाठी प्रति मेट्रिक टन ७९८ रुपये कंत्राटदाराला देण्यात येणार आहेत. त्यामुळे सात लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ५५ कोटी ८६ लाख रुपये खर्च येणार आहे. तर कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी अजून २१६ दिवस लागणार असल्यामुळे २४ हेक्टर जमीन उपलब्ध होण्यासाठी २०२७ उजाडणार असल्याचे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प विभागाकडून सांगण्यात आले.