

मुंबई: गोरेगावमधील मृणालताई गोरे उड्डाणपुलाचे पुलाचा विस्तारीकरण पूर्ण झालेला मार्ग शनिवारी मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला. या पुलामुळे प्रवासाचा पूर्वीचा पाऊण तासाचा कालावधी आता १० मिनिटांवर आला असून, स्वामी विवेकानंद मार्ग व परिसरातील वाहतूक कोंडीपासून वाहनचालकांची सूटका होणार आहे.
गोरेगाव (पश्चिम) येथील राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोड दरम्यान मृणालताई गोरे उड्डाणपुलाचा विस्तार करण्यात आला आहे. या विस्तारीत टप्प्याचे लोकार्पण महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.
पाणीवाली बाई म्हणून ज्यांनी आयुष्यभर मुंबईकरांच्या हक्कासाठी लढा दिला, त्या मृणालताई गोरे यांच्या नावाचा हा उड्डाणपूल मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी विस्तारित करण्यात आला आहे. वेगवेगळी कारणे आणि आव्हाने यामुळे हे विस्तारीकरण लांबले. मात्र यापुढे कोणत्याही प्रकल्पाचे काम लांबणार नाही, याची दक्षता घ्यावी.
एखादे काम लांबले तरी कोणत्याही स्थितीत निविदेला मुदतवाढ किंवा प्रकल्प खर्च वाढ होऊ देणार नाही, ठरलेल्या किंमतीतच प्रकल्प पूर्ण करावा लागेल, जेणेकरून करदात्यांच्या पैशांचा नाहक व्यय होणार नाही, अशी सक्त सूचना महापौर तावडे यांनी यावेळी केली.
उपमहापौर संजय घाडी म्हणाले, या विस्तारित टप्प्यामुळे प्रवासाचा वेळ कमी करणे शक्य झाले आहे. तसेच इंधनाची बचत होणार आहे. शहराच्या विकासात पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये रस्ते विकासाचे योगदान महत्वाचे आहे. त्यामुळे दळणवळण गतिमान होतानाच व्यापारासाठी हा विकास महत्वाचा असतो.