

ठळक मुद्दे
खबरदारीचा इशारा! मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली
पूर्व उपनगरांतील कुर्ला, चेंबूर, गोवंडी, भांडुप येथे पावसाचा फटका
मुंबईकरांची चिंता वाढली; घराबाहेर पडणे कठीण असून वाहनचालकांनाही त्रास सहन करावा लागतोय
मुंबई : मुंबईत सलग तीन दिवसांपासून धो-धो कोसळत असलेल्या पावसामुळे आता मंगळवारी (दि.19) पूर्व उपनगरांतील मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. यामुळे खबरदारी म्हणून मुबई महापालिकेने नदीलगतच्या सुमारे ३५० नागरिकांचे स्थलांतरण करण्यात यशस्वी झाले आहेत. तसेच एनडीआरएफची एक टिम तैनात करण्यात आली आहे. मंगळवार (दि.19) पहाटेपासून सुरु असलेला पावसाचा फटका पूर्व उपनगरांतील कुर्ला, चेंबूर, गोवंडी, भांडुप येथील विभागाला बसला आहे.
मुंबई महापालिकेच्या आपत्तकालीन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे मिठी नदीची पातळी ३.९ मीटर इतकी वाढली आहे. ही बाब लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून क्रांतीनगर, नेहरू नगर कुर्ला या परिसरातील सखल भागातील सुमारे ३५० नागरिकांचे स्थलांतर तात्पुरत्या निवारा असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मगनदास मथुराम मनपा शाळेत करण्यात आले आहे. या ठिकाणी सदर नागरिकांच्या राहण्याची व खानपानाची व्यवस्था महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे.
मिठी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे तिचे पाणी रस्ता व नागरी वस्तीमध्ये शिरले आहे. यामुळे क्रांतीनगर, नेहरू नगर, बैल बाजार, कुर्ला, एलबीएस रोड आणि चेंबूर येथील परिसर जलमय झाला आहे. मिठी नदीतील पाणी पातळी कमी होईपर्यंत परिसरात पाणी साचलेले राहणार असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
मागील दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. पाण्याचचा व्यवस्थित निचरा होत नसल्याने ठीक ठिकाणी पाणी साचले आहे. कुर्ला नेहरूनगर पोलीस ठाण्याच्या आवारात देखील ढोपरभर पाणी साचले आहे. त्यामुळे पोलिसांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला असून तक्रार नोंदविण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे.
नेहरूनगर ठाण्याच्या आवारात व परिसरात पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या निर्माण होते. पोलीस ठाण्याच्या आवारात पाणी साचल्याने पोलीस कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. असाच पाऊस कोसळत राहिल्यास पोलीस ठाण्याच्या आतमध्ये पाणी येण्याची शक्यता नाकारतां येत नाही. दरम्यान, कुर्ल्यातील सहकार नगर, सेल कॉलनीतही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले असून वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पालिका कर्मचाऱ्यांकडून पाणी उपसण्याचे प्रयत्न सुरू असले तरी पावसाचे वाढते प्रमाण आणि निचरा यंत्रणेतील त्रुटी यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात अडचणी निर्माण होत आहेत.