

मुंबई : रिक्षामध्ये बसण्यासाठी टोकले म्हणून जयराज जयपाल नायडू (48) यांची एका अल्पवयीन मुलाने हत्या केल्याची घटना कुर्ला परिसरात घडली. याप्रकरणी एका चौदा वर्षांच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.
सदर घटना सोमवारी रात्री सव्वानऊ वाजता कुर्ला येथील साबळेनगर, न्यू रेल्वे कॉलनीतील इमारत क्रमांक 105 समोर घडली. जयराज हे याच परिसरात राहत असून त्यांच्या मालकीची एक ऑटो रिक्षा आहे. सोमवारी तिथे आरोपी मुलगा त्यांच्या रिक्षामध्ये बसत होता. यावेळी त्यांनी रिक्षात बसू नकोस, असे सांगून टोकले होते. त्याचा राग आल्याने त्याने त्याच्याकडील चाकूने त्यांच्या मानेवर वार केले.
त्यात जयराज हे जागीच कोसळले होते. त्यामुळे जखमी झालेल्या जयराजला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. रुग्णालयातून माहिती प्राप्त होताच नेहरुनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी मृत जयराजचा मुलगा जोशूबा नायडू याच्याकडून पोलिसांना घडलेला प्रकार समजला. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला.