

मेढा/मुंबई : व्यवसायासाठी मदत तसेच मुलांना शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून महिगाव (ता. जावली) येथील शेतकऱ्याची तब्बल 1 कोटी 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मेढा पोलिस ठाण्यात मुंबईतील एका नगरसेविकेसह 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शैलेश काशिनाथ पवार (48, रा. महिगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नगरसेविका शरिफा टाटा खान (चेंबूर, मुंबई), समीर चुंडमुंग, जहीर अमानुल्ला खान, इमान अमानुल्ला खान, नीलेश बाळकृष्ण ठाकूर, आनंद सिंग ऊर्फ बाबुशेठ ऊर्फ अंकल (रा. मुंबई, मूळ रांची, झारखंड), रेणू रामू सिंग ऊर्फ रेणू नीलेश ठाकूर, आशिष अगरवाल (रेल्वे विभाग अधिकारी), सुधीर गायकवाड, किशोर माळी (विभाग मुंबई) व शामल मुखर्जी (मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सप्टेंबर 2022 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत संशयितांनी संगनमत करून फिर्यादीची फसवणूक केली.
व्यवसायासाठी पैशाची गरज असल्याचे सांगून तसेच फिर्यादीची मुले व नातेवाईकांच्या मुलांना भारत सरकारच्या ‘वंदे भारत’ रेल्वे प्रकल्पात व महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवण्यात आले.
या आमिषाला बळी पडून फिर्यादीकडून बँक ऑफ महाराष्ट्र, सायगाव (ता. जावली) येथील खात्यामार्फत तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर, सोलापूर व मुंबई येथे रोख रक्कम व यूपीआयद्वारे एकूण 1 कोटी 80 लाख रुपये घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
भरती प्रक्रियेच्या नावाखाली संबंधित मुलांना वेळोवेळी ई-मेल, व्हॉटस्ॲप व मोबाईलद्वारे संपर्क साधण्यात आला. रेल्वे खात्यात टीटीई पदावर व सार्वजनिक बांधकाम विभागात नियुक्ती झाल्याचे भासवण्यासाठी खोटे व बनावट आदेश तयार करण्यात आले. तसेच संबंधितांना कार्यालयात बोलावून खोट्या मुलाखती घेण्यात आल्या. जिल्हा रुग्णालये (अहिल्यानगर, सोलापूर, कोल्हापूर) येथे बनावट वैद्यकीय तपासण्या करून अंतिम निवड व नियुक्तीची खोटी पत्रे देण्यात आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.