

मुंबई: व्यवस्थापनशास्त्राच्या (एमबीए/एमएमएस) केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. या फेरीत १२ हजार ८१७ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविले होते.
त्यापैकी ४ हजार ४५४ विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची संधी मिळाली आहे. तर ४ हजार ७१४ विद्यार्थ्यांना त्यांनी नोंदविलेल्या पहिल्या सहा पसंतीक्रमांपैकी एका पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.
राज्यात व्यवस्थापनशास्त्राच्या तिसऱ्या फेरीसाठी एकूण २० हजार ८६९ जागा उपलब्ध होत्या. या जागांसाठी निर्धारित मुदतीत १२ हजार ८१७ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरले. त्यामुळे याच विद्यार्थ्यांचा विचार तिसऱ्या कॅप फेरीतील प्रवेशासाठी करण्यात आला. त्यातून ४ हजार ४५४ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे.
तिसऱ्या फेरीत ४ हजार ७१४ विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार पहिल्या सहापैकी एका पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. या विद्यार्थ्यांचे प्रवेश ‘ऑटो फ्रीज’ झाले असून, त्यांना मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेणे अनिवार्य आहे. त्यांनी प्रवेश नाकारल्यास चौथ्या कॅप फेरीत सहभागी होता येणार नाही.
यंदा व्यवस्थापनशास्त्राच्या एमबीए/एमएमएस अभ्यासक्रमांसाठी राज्यात एकूण ५८ हजार १५३ जागा उपलब्ध होत्या. पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत आतापर्यंत ३१ हजार ५३७ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला आहे, तर ५ हजार ७४७ विद्यार्थ्यांनी बेटरमेंटद्वारे प्रवेश घेतला आहे. आता तिसऱ्या फेरीसाठी २० हजार ८६९ जागा उपलब्ध आहेत.
दरम्यान, तिसऱ्या फेरीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना २५ ते २७ ऑगस्टदरम्यान संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष हजर राहून आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. तसेच प्रवेश शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे.