

Maratha Morcha CSMT local train Update:
मुंबई : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांच्या महामोर्चा मुंबईतील लोकल वाहतुकीवरही परिणाम झाला. काही आंदोलक रेल्वे रुळांवर उतरले होते. मात्र पोलिसांनी वेळीच त्यांना रोखले. रेल्वे रुळावर उतरलेल्या आंदोलकांना तत्काळ हटवण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी दिली.
शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागणीसाठी उपोषण सुरू आहे. या आंदोलनासाठी राज्यभरातील हजारो कार्यकर्ते मुंबईत आझाद मैदानात पोहोचले आहेत. काही आंदोलक हे मुंबई छत्रपती महाराज टर्मिनसमध्ये पोहोचले.
काही आंदोलक हे रेल्वे रुळांवरही उतरले होते. पोलिसांनी वेळीच त्या आंदोलकाला हटवले. मुंबईतील लोकल गाड्यांच्या वाहतुकीसंदर्भात मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पावसाचा जोर वाढल्याने सीएसएमटी स्थानकातील गर्दी वाढली. रुळावर उतरलेल्या आंदोलनकर्त्यांना तत्काळ हटवण्यात आलं असून प्रवाशांना अडचण होणार नाही याची काळजी घेत आंदोलन करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
आंदोलनकर्ते बाहेरून आलेले असल्याने त्यांना मुंबई लोकलची सवय नाही. जोवर प्रत्येक प्रवासी लोकलमधून उतरत नाही तोवर गाडी न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्लॅटफॉर्म तिकिट बाळगण्याची अट तत्पूर्वती शिथिल करण्यात आली आहे, असंही नीला यांनी सांगितले.
आंदोलकाला रोखले
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात एका मराठा आंदोलकाने टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. अंगावर डिझेल ओतून घेत त्यांनी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी संबंधित आंदोलकाला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
हार्बर मार्गावरील गर्दी वाढली
आंदोलनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट परिसरात गाड्या पार्क केल्या आहेत. तिथून पुढे लोकलने प्रवास करत आझाद मैदान गाठत आहेत. त्यामुळे हार्बर मार्गावरील गर्दी वाढली आहे.
सीएसएमटी भागातील दुकानं बंद
मराठा आंदोलकांची सीएसएमटी स्थानकातील संख्या पाहता सीएसएमटी सब वे, आणि आसपासच्या परिसरातील सारी दुकानं बंद करण्यात आलीत.
पावसातही आंदोलक उपोषणाबाबत ठाम
मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे. याच वेळी मुसळधार पावसानं आंदोलकांची गैरसोय निर्माण झाली. आझाद मैदानावर पाणी साचल्याने आंदोलकांनी निवारा शोधण्यास सुरुवात केली होती. मात्र, मुसळधार पावसातही आंदोलक उपोषणावर ठाम आहेत.