

मुंबई: राज्यात प्लास्टिकबंदी असताना सर्वच बाजारपेठा आणि शहरांमधील मार्केटमध्ये पातळ पिशव्यांची खुलेआम विक्री सुरू आहे. १ लाख ७० हजार आस्थापनांच्या तपासणीअंती ७८.४७ टन सिंगल यूज प्लास्टिक जप्त करण्यात आला आहे. प्रत्यक्षात यापेक्षा अधिक पातळ पिशव्यांची विक्री सुरू आहे.
एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत १ लाख ७० हजार ८८८ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५ हजार ७३१ आस्थापनांवर कारवाई करून २ कोटी ८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर ७८.४७ मेट्रिक टन सिंगल-यूज प्लास्टिक जप्त करण्यात आले.
राज्यात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी असली, तरी प्रत्यक्षात बाजारपेठा, दुकाने आणि रस्त्यावरील विक्रेत्यांकडे प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिक साहित्यांची विक्री सुरू आहे.
सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महसूल, पोलिस आणि इतर विभागांच्या संयुक्त पथकांमार्फत कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, जनजागृती अभियानही राबविण्यात येत असल्याचा दावा केला आहे. परंतु, प्लास्टिकचा वापर अद्यापही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
दंडात्मक कारवाई पुरेशी नसून उत्पादन, पुरवठा आणि विक्री साखळीवर अधिक कठोर नियंत्रणाची गरज असल्याची भावना पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.