

मुंबई: राज्यातील विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी निवडणूक होत असून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बंडखोरांना थंड करण्याचे आव्हान महायुतीपुढे आहे.
जवळपास सर्वच मतदारसंघांत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत आहे. परंतु, या निवडणुकीत सर्वत्र बंडखोरी झाल्याने बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विशेषतः महायुतीपुढे बंडखोरीचे जास्त आव्हान आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बंडखोरांना इशारा दिला की, विधानपरिषदेच्या 17 जागांवर महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयी होतील. बंडखोरांनी वरिष्ठ नेत्याशी बोलून अर्ज माघारी घ्यावेत.
आगामी काळात अर्ज मागे घेणाऱ्यांचा निश्चित विचार करू. दरम्यान, बुधवारच्या दिवसात महायुतीला तीन ठिकाणांची बंडखोरी टाळण्यात यश आले आहे, असे रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील बंडखोरांची समजूत काढण्यासाठी बुधवारी आपले सर्व शासकीय कार्यक्रम रद्द केले.