

मुंबई: गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये भारत आणि जगाची जोडणी करण्यासाठी महाराष्ट्र हे प्रवेशद्वार आहे. भविष्यातील विविध क्षेत्रातील गरजा लक्षात घेता महाराष्ट्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन आणि विकास, डेटा सेंटर, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर यासोबत पायाभूत सुविधांची परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी गुंतवणूकदारांचे महाराष्ट्र हे यशस्वी डेस्टिनेशन असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्यातील विविध क्षेत्रातील संधीचा लाभ घेत अमेरिकेतील गुंतवणूकदारांनी आपल्या कल्पना, संशोधन घेऊन महाराष्ट्रात यावे. महाराष्ट्र शासन त्यांना येथील कौशल्य, बाजारपेठ, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देईल. त्यामुळे त्यांनी राज्यात गुंतवणूक करावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या (आयएसीसी) हॉटेल ललित येथे आयोजित राष्ट्रीय परिषद २०२६ मध्ये मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर भारतातील अमेरिकेचे राजदूत जॉर्जिस गोर, उत्तर प्रदेशाचे राज्यमंत्री दिनेश प्रताप सिंह, इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स राष्ट्रीय अध्यक्ष अनुप आचार्य, कार्यकारी उपाध्यक्ष प्रशांत कृष्णन, उपासना अरोरा, अवनीश अवस्थी उपस्थित होते.
महाराष्ट्र ही जगातील पहिल्या २० देशांमधील अर्थव्यवस्था
महाराष्ट्र ही ६६० बिलियन डॉलर अर्थव्यवस्था असून, मागील ७ वर्षांपासून १०.२ टक्के दराने विकास करीत आहे. राज्यात एकूण लोकसंख्येच्या ६५ टक्के लोकसंख्या ही २७ वर्षे वयापर्यंत आहे. जगाच्या दृष्टीने विचार केला, तर महाराष्ट्र ही जगातील पहिल्या २० देशांमधील अर्थव्यवस्था आहे.
भारत हा जगामध्ये सर्वात तरुण देश आहे आणि या तरुण देशामध्ये महाराष्ट्र हे तरुणाईचे आकर्षण आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही वैविध्यपूर्ण आहे. उत्पादन क्षेत्रापासून ते मनोरंजन क्षेत्रापर्यंत सर्व क्षेत्रांचा वाढता सहभाग राज्याच्या अर्थव्यवस्थेत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
भारत-अमेरिकेचे संबंध दृढ : राजदूत सर्जियो गोर
भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर म्हणाले, भारत आणि अमेरिकेतील संबंध दृढ आहेत. भविष्यातील आव्हानांचा विचार करता दोन्ही देशातील भागीदारी महत्त्वाची ठरणार आहे. पुढील काळात दोन्ही देशांना आर्थिक संबंध वाढविण्यावर भर द्यावा लागणार आहे.