

मुंबई: सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्या या कामगिरीवर आधारित तसेच पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने करण्यात याव्यात, असे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. यासाठी राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्राच्या मूल्यांकन व रँकिंग प्रणालीचा आधार घेण्यात येणार आहे. बैठकीस डॉ. निपुण विनायक, ई. रवींद्रन, डॉ. कादंबरी बलकवडे, डॉ. नितीन अंबाडेकर, डॉ. विजय कंदेवाड यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत आबिटकर बोलत होते. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्राच्या धर्तीवर कार्यरत असलेले एसएचएसआरसी राज्यातील जिल्हा व महापालिका क्षेत्रांतील आरोग्य संस्थांचे तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे नियमित मूल्यांकन करते.
प्रशासकीय, तांत्रिक आणि वित्तीय निकषांच्या आधारे दरमहा गुणांकन व रँकिंग निश्चित केली जाते. राज्यातील आरोग्य कार्यक्रमांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होत असला, तरी नागरिकांना अधिक प्रभावी आरोग्यसेवा देण्यासाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधीचा वापर वाढविण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. सीएसआर निधी देणाऱ्या संस्थांकडे ठोस प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही विभागाला देण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा लेखा व्यवस्थापक, एनएचएम सल्लागार आणि कार्यक्रम अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील आरोग्य संस्थांना नियमित भेटी देऊन वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावेत, असे निर्देशही आबिटकर यांनी दिले. बैठकीत पदभरती, मनुष्यबळ सुसूत्रीकरण आणि अधिकाऱ्यांच्या क्षेत्रभेटींचा आढावा घेण्यात आला.