

मुंबई: राज्यातील सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षा, विद्युत व्यवस्था, इमारत बांधकाम तसेच रुग्णालयातील विविध यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.
रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या जीविताची सुरक्षा सर्वोच्च प्राधान्याची असून, अग्निसुरक्षेतील कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
आयसीयू, एनआयसीयू, ओटीची विशेष तपासणी
रुग्णालयातील आयसीयू, एनआयसीयू, नर्सरी आणि ऑपरेशन थिएटरसारख्या संवेदनशील विभागांच्या अग्निसुरक्षेची विशेष तपासणी केली जाणार आहे. याशिवाय वैद्यकीय गॅस पाइपलाइन, विद्युत व्यवस्था, आपत्कालीन स्थलांतरणाची तयारी, अग्निशमन उपकरणांची उपलब्धता व कार्यक्षमता, कर्मचारी प्रशिक्षण आणि मॉक ड्रिल यांचाही आढावा घेतला जाणार आहे.
नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
प्रत्येक आरोग्य संस्थेत अग्निसुरक्षेसाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे अधिकारी फायर ऑडिट, विद्युत सुरक्षा, अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन स्थलांतरण, कर्मचारी प्रशिक्षण आणि मॉक ड्रिलचा नियमित आढावा घेऊन त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करतील.
संस्थाप्रमुखांची जबाबदारी निश्चित
फायर ऑडिटमध्ये दिरंगाई किंवा सुरक्षा उपाययोजनांमधील गंभीर त्रुटींमुळे अनुचित घटना घडल्यास संबंधित संस्थाप्रमुखांची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे शासकीय तसेच खासगी रुग्णालयांनी सुरक्षा उपाययोजना वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अधिकाऱ्यांवर जबाबदारी
सर्व जिल्ह्यांतील शासकीय, खासगी आणि धर्मादाय आरोग्य संस्थांचे ऑडिट करून घेण्याची जबाबदारी रुग्णालय प्रमुख, विभागीय उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महानगरपालिका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षक यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ऑडिटनंतर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल नियमितपणे शासनाला सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
बारामती शासकीय महिला रुग्णालयात २ नवजात बालकांचा मृत्यू
अमरावतीच्या रुग्णालयात नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रकरण ताजे असतानाच बारामतीतील शासकीय महिला रुग्णालयात दोन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि. २४) घडली. मंजू थोरवे आणि किशोरी सरगर या मातांची नवजात बालके यात दगावली.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला रुग्णालयात सिझेरियनची आवश्यकता असलेल्या काही रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी वेळेत घेतले जात नसल्याची तक्रार आहे. तसेच रुग्णालयात आवश्यक त्या प्रमाणात कर्मचारी उपलब्ध नसल्याने वैद्यकीय यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्येच मंजू थोरवे आणि किशोरी सरगर यांची बालके दगावल्याचा आरोप होत आहे.