

मुंबई: राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या जतन व संवर्धनास शासनाचे प्राधान्य असून तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच भाविक-पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयी- सुविधांसह आरोग्य सुविधांची उपलब्धता करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी दिले. यावेळी शिखर समितीच्या बैठकीत सहा तीर्थक्षेत्रे विकासासाठी एकूण 993.72 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना आणि निधीला मंजुरी देण्यात आली.
सह्याद्री अतिथीगृह येथे विविध तीर्थक्षेत्रे विकास आराखडा शिखर समितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, वनमंत्री गणेश नाईक, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार दिलीप वळसे-पाटील, आमदार धनंजय मुंडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह सर्व संबंधित अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
श्री क्षेत्र भीमाशंकर आदर्श गाव विकासासाठी 172 कोटी -
श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग क्षेत्राच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी कामे करावीत. या प्रकल्पासाठी सुमारे 172.22 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून मे 2027 पर्यंत कामे पूर्ण करावीत, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.
संगम माहुली (सातारा) समाधी स्थळ संवर्धन प्रकल्पासाठी 133 कोटींची तरतूद-
संगम माहुली समाधीस्थळ संवर्धनासाठी 133 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळांचा जीर्णोद्धार आणि लँडस्केप विकास केला जाणार आहे. याशिवाय, ऐतिहासिक संगमेश्वर मंदिर व घाटाचे संवर्धन, नवीन हँगिंग ब्रिज (झुलता पूल), व्ह्यूइंग गॅलरी आणि सुसज्ज पाथवेची निर्मिती करून या परिसराला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ बनविण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखडा (वेरुळ)साठी 210 कोटी रुपयांची तरतूद-
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ येथील प्रसिद्ध घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या विकासासाठी सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत आता 210.45 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आली असून, यामध्ये 53.82 कोटींच्या वाढीव निधीची मागणी समाविष्ट आहे. यासंबंधीची कामे गतीने करावीत, असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परिसर विकासासाठी 301.54 कोटींची तरतूद -
श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परिसर मूळ आराखड्यातील पुढील नवीन कामांसाठी सुमारे 301.54 कोटी रुपयांचा अतिरिक्त आराखडाही तयार करण्यात आला आहे. तीन टप्प्यांत या मंदिराची कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
संत तुकाराम महाराज जन्मस्थान संवर्धनासाठी 41 कोटी रुपये
संत तुकाराम महाराज यांचे देहू येथील जन्मस्थान, वैकुंठगमन मंदिर परिसर तसेच भंडारा डोंगर परिसराच्या संवर्धन आणि विकासासाठी सर्वंकष आराखडा 41.71 कोटींचा आहे.आमदार सुनील शेळके यांनी संत तुकाराम महाराज जन्मस्थानाच्या संवर्धन आराखड्यात सुचविलेल्या कामांचा आराखड्यात समावेश करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
किल्ले अजिंक्यतारासाठी 134.80 कोटींची तरतूद
सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले अजिंक्यताराचे जतन, संवर्धन आणि परिसर सुशोभीकरणासाठी 134.80 कोटी रुपयांचा विकास आराखडा आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नियोजित कामे वेळेत पार पाडावीत, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.