

मुंबई: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड ३० दिवसांवर पोहोचला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळजन्य स्थितीबाबत राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सुमारे पाऊण तास चर्चा करण्यात आली.
प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यातील पावसाची स्थिती, खंडाचा कालावधी आणि संभाव्य अडचणींचे जिल्हानिहाय सविस्तर सादरीकरण मंत्रिमंडळासमोर करण्यात आले. टंचाई आणि दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची तयारी सुरू करण्यात आली आहे.
राज्य सरकार कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली. मदतीची तयारी सुरू केली असून त्याचा आराखडा तयार करण्यास सुरुवात झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
पावसाची परिस्थिती चिंताजनक
राज्यातील पावसाची परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, पावसाचा खंड किती आहे, त्यातून कोणत्या अडचणी निर्माण होऊ शकतात, याची संपूर्ण माहिती घेण्यात आली.
या पार्श्वभूमीवर टंचाई तसेच दुष्काळाच्या परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. एनडीआरएफ निकषांनुसार सर्वेक्षण ५ ऑक्टोबरनंतर करावे लागते. त्याआधीच आवश्यक उपाययोजनांची तयारी सुरू करण्यात आली असल्याचे फडणवीस म्हणाले.
सर्वेक्षणाची तयारी
५ ऑक्टोबरपासून होणारे सर्वेक्षणही पुढील आठ-दहा दिवसांत करण्याची तयारी करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारची मदत आवश्यक आहे, याचाही विचार सुरू आहे, असे फडणवीस म्हणाले
एमएचसीईटीबाबत एसआयटी
सीईटीसंदर्भात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. यासंदर्भात जितक्या तक्रारी असतील त्यांची एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल. फॉरेन्सिक ऑडिटही केले जाणार असून कुठेही गडबड निघाल्यास फौजदारी कारवाई केली जाईल, तसेच आहे त्या परिस्थितीतच परीक्षा होतील असे सांगतानाच ऑनलाईन - ऑफलाईन असा कुठलाही निर्णय विद्यार्थ्यांशी चर्चा केल्याशिवाय घेतला जाणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मग, प्रियांका गांधींना जबाबदारी द्या
काँग्रेसच्या इतिहासात प्रियांका गांधी या अशा पहिल्या जनरल सेक्रेटरी आहेत ज्यांना एक हजार दिवस झाल्यानंतरही कुठलाच विभाग देण्यात आला नाही. त्यांना ना कुठला विभाग मिळाला, ना कोणते राज्य , ना कुठले कामकाज. इतर राज्यांतील नेतृत्व बदलण्याचा विचार करण्यापूर्वी प्रियंका गांधी यांना काहीतरी जबाबदारी द्यावी. त्यांना नावापुरते सरचिटणीस ठेवू नये, असा टोला फडणवीस यांनी काँग्रेसला लगावला.
मराठी कोणी हिरावून घेऊ शकत नाही
महाराष्ट्र हे बहुभाषिक राज्य असल्याच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. अमित शाह यांचे संपूर्ण भाषण ऐकले असते तर कदाचित अशा प्रतिक्रिया आल्या नसत्या.
अमित शाह यांनी महाराष्ट्रातील मराठीचे महत्त्व, मराठीचा गौरव आणि मातृभाषेतच शिक्षण देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आग्रह आपल्या भाषणात स्पष्ट केला होता. त्याचबरोबर महाराष्ट्रातील लोक वेगवेगळ्या भाषा शिकतात, या अर्थाने त्यांनी महाराष्ट्राचा बहुभाषिक असा उल्लेख केला होता. बहुभाषिक असण्याचा अर्थ मातृभाषा वेगळी असणे असा होत नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दिशा सालियन प्रकरणात तर्कवितर्क नको
दिशा सालियन प्रकरणातील तक्रारीत आदित्य ठाकरेंचे नाव आले आहे. त्याबाबत माध्यमांनी विचारले असता, मी एफआयआर पाहिलेला नाही. उच्च न्यायालयाने निर्णय देऊन हा विषय सीबीआयकडे सोपविला आहे. सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. आता सीबीआय काय चौकशी करते, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या प्रकरणावर आताच तर्कवितर्क करणे योग्य नाही, असे फडणवीस म्हणाले.