

मुंबई: राज्यातील सायबर गुन्ह्यात किरकोळ घट झाल्याचे मागील पाच वर्षांतील आकडेवारीतून समोर आले आहे. एकीकडे दाखल होणाऱ्या गुन्ह्यात किंचित घट झाली असली तरी गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण मात्र वाढले आहे.
2025 मध्ये 8 हजार 684 गुन्हे दाखल असून 2024 च्या तुलनेत सायबर गुन्ह्यांमध्ये 1 हजार 782 ने घट झाली आहे. दुसरीकडे गुन्हे उकल करण्याचे प्रमाण 2025 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 18.49 टक्क्यांवरून 26.75 टक्क्यांवर पोहचले आहे.
राज्यात सध्या 50 सायबर पोलिस ठाणे कार्यरत असून तिथे सायबर पोलिसांच्या माध्यमातून कार्यवाही सुरू आहे.दरम्यान सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेत त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी सायबर इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्यात येणार आहे.
वाढत्या पायरसीला आळा घालण्याकरिता मनोरंजन उद्योगक्षेत्र आणि महाराष्ट्र सायबर यांच्या संयुक्त प्रयत्नातून विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाने 14 हजार 376 वेबसाईटवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. तर, पायरसीत गुंतलेल्या 1 हजार 321 वेबसाईट बंद करण्यात आल्या आहेत.