

मुंबई : राज्यातील बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमातील हजारो रिक्त जागा भराव्यात आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी, यासाठी इंडियन नर्सिंग कौन्सिलकडे शून्य पर्सेंटाइल किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशासाठी पात्रता देण्याची विनंती केल्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागातील सूत्रांकडून समजते.
गेल्या शैक्षणिक वर्षात राज्यातील २९४ बीएससी नर्सिंग महाविद्यालयांमध्ये एकूण १६ हजार ५३० जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी १७ शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महाविद्यालयांतील १ हजार १८० जागांपैकी १ हजार १७४ जागांवर प्रवेश झाले होते. तर केवळ सहा जागा रिक्त राहिल्या. मात्र २७७ खासगी महाविद्यालयांमधील १५ हजार ३५० जागांपैकी केवळ ९ हजार ७८३ जागांवर प्रवेश झाले आणि तब्बल ५ हजार ५६७ जागा रिक्त राहिल्या.
गेल्या वर्षी प्रवेशासाठी किमान ५० पर्सेंटाइलची अट होती. मात्र तीन प्रवेश फेऱ्यांनंतरही मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्याने सीईटी कक्षाने इंडियन नर्सिंग कौन्सिलकडेकडे विशेष विनंती केली होती. त्यानंतर प्रथमच शून्य पर्सेंटाइल किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशासाठी पात्रता देण्यात आली होती. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात प्रवेशसंख्या वाढण्यास मदत झाली होती. यंदा सीईटी कक्षाने प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच शून्य पर्सेंटाइलचा प्रस्ताव पाठविला आहे.
पात्रतेबाबत स्पष्टता
उशिरा निर्णय झाल्यास अनेक विद्यार्थी इतर अभ्यासक्रमांकडे वळतात आणि नर्सिंगच्या जागा रिक्त राहतात. त्यामुळे यंदा सुरुवातीलाच पात्रतेबाबत स्पष्टता मिळावी, अशी भूमिका सीईटी कक्षाने घेतल्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या सांगितले.