मुंबईः पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीला चार महिने शिल्लक असताना महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. महाविकास आघाडीत जागावाटप निश्चित झाल्याची चर्चा आहे. त्यामध्ये काँग्रेस सर्वाधिक १०० ते १०५ जागा, शिवसेना उद्धव ठाकरे गट ९० ते ९५ जागांवर उमेदवार देणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ८० ते ८५ जागा लढवणार असल्याची चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर शनिवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेपूर्वी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये जागावाटपाची प्राथामिक बैठक झाल्याची चर्चा आहे. तिन्ही पक्षांच्या विद्यमान आमदारांच्या जागा सोडता कोणत्या जागांवर कोणत्या पक्षाची ताकद आहे याची चाचपणी करण्यात आली.
हा फॉर्म्युला पाहता काँग्रेसला १०० ते १०५ जागा मिळू शकतात. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्याने जादा जागांची मागणी केली आहे, तर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा स्ट्राईक रेट हा ८० टक्के राहिल्याने पवारांची राष्ट्रवादी अधिकच्या जागा मागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा लढविणारे उद्धव ठाकरे हे देखील जागावाटपात दुय्यम स्थान स्वीकारणार नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीचे विधानसभेचे जागावाटप सोपे नसेल.
एकीकडे महाविकास आघाडीचे जागावाटप ठरत आल्याची चर्चा असताना दुसरीकडे महायुतीतील घटकपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी विधानसभा निवडणुकीत ८० ते ९० जागांसाठी आग्रही असण्याचे संकेत दिले आहेत. आमचे स्वतःचे ४० पेक्षा जास्त आमदार आहेत. त्यामुळे आम्हाला जागावाटपात योग्य स्थान मिळावे ही आमची अपेक्षा आहे. आम्ही आमचे म्हणणे महायुतीतील पक्षासमोर मांडू आणि त्यांना पटवून देऊ, असे पटेल म्हणाले. त्यामुळे जागावाटपाची रस्सीखेच वाढण्याची शक्यता आहे.