

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी ‘नंदनवन’ बंगल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड हेदेखील होते. सुमारे तासाभराच्या या भेटीत कोणत्या राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबत तर्क-वितर्क लावले जात असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या ‘एनडीए’सोबत येण्याच्या चर्चेने जोर धरला असताना या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
एकनाथ शिंदे हे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन परतले आहेत. या भेटीत दोघांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ‘एनडीए’मधील समावेशाबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. ते दिल्लीतून परतल्यानंतर लगेच ही भेट झाली आहे. शरद पवार गट ‘एनडीए’सोबत आल्यास केंद्र आणि राज्यातदेखील सत्तेत वाटा मागेल. तसे झाल्यास सुप्रिया सुळे यांची केंद्रात, तर राज्य मंत्रिमंडळात जयंत पाटील यांच्यासह राजेश टोपे आणि जितेंद्र आव्हाड यांचीही वर्णी लावली जाऊ शकते.