पुढारी ऑनलाईन डेस्क: मराठा आरक्षण प्रश्नावरून मनोज जरांगे-पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत त्यांचा द्वेष करत आहेत. यावरून मला असे वाटते की, त्यांना डीडी नावाचा आजार झाला आहे. ज्या आजाराने त्यांना व्यापून टाकले आहे, अशी टीका भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. या संदर्भातील व्हिडिओ आणि पोस्ट त्यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून शेअर केली आहे.
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पुढे बोलताना ते म्हणाले, 'गेल्या ६० वर्षांत जे होऊ शकलं नाही ते मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी केलं. २०१७-१८ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिले. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले. असे असतानाही जरांगे-पाटील नेमकं कोणाच्या छत्रछायेखालून हा द्वेष करत आहेत? हा संशोधनाचा विषय आहे, असेही लाड म्हणाले.
जरांगे-पाटील साहेब, तुम्हाला माहिती देणारे चुकीची माहिती देत आहेत. आम्ही तुमचं आवाहन स्वीकारायला तयार आहोत, परंतु तुम्ही चर्चेला तयार आहात का? आम्हाला तुमचा अभिमान आहे, परंतु एका विशिष्ठ व्यक्तीला टार्गेट करणे चुकीचे आहे. समाजासाठी लढायचे असेल तर चर्चेतून मार्ग काढणे आवश्यक आहे, असे देखील प्रसाद लाड यांनी जरांगे-पाटील यांना म्हटले आहे.