

मुंबई : भारतातील अब्जाधीशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2026 नुसार, भारतात आता एकूण 308 अब्जाधीश आहेत. हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 24 ने अधिक आहे. या वाढीसह अमेरिका आणि चीननंतर भारत जगातील अब्जाधीशांच्या संख्येत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या वर्षी भारतीय श्रीमंतांच्या यादीत 57 नवीन नावे जोडली गेली आहेत. याच काळात विविध कारणांमुळे 27 व्यक्ती यादीतून बाहेर पडल्या.
हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालात असे दिसून आले आहे, की भारतीय अब्जाधीशांच्या एकूण संपत्तीतही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती एकाच वर्षात 10 टक्क्यांनी वाढून 112.6 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या काळात 199 अब्जाधीशांच्या संपत्तीत वाढ झाली. तर 109 अब्जाधीशांच्या संपत्तीत एकतर घट झाली किंवा ती तशीच राहिली. भारतातील एकूण अब्जाधीशांपैकी 7 टक्के महिला आहेत.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक आणि अध्यक्ष सायरस एस. पूनावाला यांच्या संपत्तीत गेल्या वर्षभरात सर्वाधिक वाढ झाली आहे. त्यांची संपत्ती 91,000 कोटींनी वाढली आहे. भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल आहेत. ते 32 वर्षांचे असून त्यांची एकूण संपत्ती 14,440 कोटी रुपये आहे. अहवालानुसार, भारतात 23 महिला अब्जाधीश आहेत, ज्यांची एकूण संपत्ती 9.8 लाख कोटी आहे.
मुंबई हे भारतातील अब्जाधीशांसाठी सर्वात मोठे केंद्र राहिले आहे. शहरात एकूण 95 अब्जाधीश राहतात. मुंबईत या वर्षी 15 नवीन अब्जाधीशांची भर पडली. हा आकडा न्यूयॉर्क आणि लंडनसारख्या जागतिक शहरांपेक्षा जास्त आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी पुन्हा एकदा भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 9.8 लाख कोटी रुपये इतकी आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 7.5 लाख कोटी रुपये आहे. एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या अध्यक्षा रोशनी नादर मल्होत्रा तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती 3.2 लाख कोटी रुपये इतकी आहे.
अहवालानुसार, आरोग्यसेवा क्षेत्रात या वर्षी सर्वात जास्त नवीन अब्जाधीश आले आहेत. यादीत 53 नवीन नावे सामील झाली आहेत. या क्षेत्रापाठोपाठ औद्योगिक उत्पादने क्षेत्रात 36 नवीन अब्जाधीश आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रात 31 नवीन अब्जाधीश आहेत.