

पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अति मुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यात येत्या ५ दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. यामध्ये रायगड (२४, २५ ऑगस्ट), रत्नागिरी (२४ ऑगस्ट), सिंधुदुर्ग (२४), पुणे (२४, २५ ), सातारा (२४, २५ ऑगस्ट) या जिल्ह्यांना हवामान विभागाने 'रेड अलर्ट' दिला आहे.
दक्षिण कोकण-गोवा जिल्ह्यांत आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, ताशी 30-40 किमी वेगाने वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात शनिवार ते मंगळवार या चार दिवसांत मान्सून जोरदार सक्रिय होत असून, राज्यातील सर्वच जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे, मुंबई, पालघरसह १२ जिल्ह्यांना अतिमुसळधारेचा ऑरेंज अलर्ट, तर कोल्हापूरसह २८ जिल्ह्यांना मुसळधारेचा यलो अलर्ट दिला आहे.
बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातही कमी दाबाचे पट्टे तयार होत असल्याने मान्सूनचे वारे प्रचंड वेगाने सक्रिय झाले आहे. त्यामुळे शनिवार, दि. २४ ते मंगळवार, दि. २७ ऑगस्ट या कालावधीत राज्यात मान्सून जोरदार बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, पुणे, पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
जेव्हा एखाद्या भागात अतिमुसळधार, अतिवृष्टी किंवा ढगफुटीचा अंदाज असतो. अशावेळी रेड अलर्ट जारी करण्यात येतो. रेड अलर्ट म्हणजे मोठ्या संकटाची शक्यता. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो घरी राहण्याच्या सूचना दिल्या जातात. दरम्यान पूर, भूस्खलन यासह तत्सम नैसर्गिक आपत्ती देखील या दरम्यान उद्भवू शकतात.