पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईसह उपनगरात पावसाच्या धुवाँधार सरी कोसळत आहेत. मुंबईतील अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. गेल्या काही तासांपासून तुफान पाऊस सुरू असतानाच अरबी समुद्रालाही मोठे उधाण आले आहे. किनाऱ्यावर सुमारे पावणे पाच मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत.
गेल्या २४ तासात मुंबईला महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा वाढला आहे. मुंबईला पाणीपुरवठा केला जाणारा विहार तलावही भरून वाहत आहे. उपनगरात धुवाँधार पावसामुळे व्यवहार ठप्प झाले आहेत. मुंबईसह क्षेत्रातील सर्व शाळा व सर्व महाविद्यालये यांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे शाळांमध्ये शुकशुकाट आहे. काही भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याची परिस्थीती आहे.
रायगडमध्येही धुवाधाँर पावसानंतर आज (गुरुवार) दुपारनंतर अरबी समुद्रला उधाण आले आहे. पुढील चार तासांत लाटांचे पाणी खाडीच्या मुखातून नदी पात्रात घुसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे. नदी काठच्या नागरिकांनी दक्ष रहावे, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
भारतीय हवामान खात्याद्वारे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा या जिह्यांना आज (दि.२५ जुलै) रेड अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान मुंबई शहरासह उपनगरात अतिमुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे.