

मुंबई: महामार्गावरील घातक पदार्थांच्या वाहतुकीसाठी थेट कंपन्यांना जबाबदार ठरवले जाणार आहे. जबाबदारी निश्चित करण्यासह इतर काही मार्गदर्शक तत्त्वे तज्ज्ञ समितीने सुचवली आहेत. 3 फेब्रुवारीला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ही समिती नेमली होती.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात आडोशी बोगद्याजवळ प्रोपलेन हा घातक पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहनाला अपघात झाल्यामुळे संपूर्ण महामार्ग ठप्प झाला होता. त्यानंतर घातक पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहनांसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती नेमण्यात आली होती.
कंपन्यांवर जबाबदारी निश्चित करण्यासोबतच, सुरक्षाविषयक नियमांची अंमलबजावणी, वाहतूक विभाग, महामार्ग पोलीस आणि एमएसआरडीसी यांची मंजुरी आणि आपत्कालीन प्रतिसाद कार्यक्रम या सूचनाही समितीने केल्या आहेत.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून दररोज घातक आणि ज्वलनशील पदार्थ वाहून नेणारी 250 वाहने ये-जा करतात. तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशीनुसार या वाहनांचा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी थेट कंपन्यांवरच टाकण्यात येणार आहे.
तसेच पुढील आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारीही कंपन्यांना घ्यावी लागणार आहे. राज्य शासनाकडून या अहवालावर अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर पुढील दोन महिन्यांत तज्ज्ञ समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी केली जाईल.