मुंबई : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करताना स्टेनलेस स्टील वापरले असते तर पुतळा पडला नसता, असे केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात कोणतेही बांधकाम करताना त्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर होणे गरजेचे आहे. कारण, स्टेनलेस स्टीलला गंज चढत नाही. समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलांसाठी स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात यावा, यासाठी मी गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करत आहे. आम्ही मुंबईत जेव्हा ५५ उड्डाणपूल बांधले तेव्हा एका माणसासोबत फेरफटका मारत होतो. त्यावेळी उड्डाणपुलासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडावरील कोटिंग पावडर निघून जाऊन त्याला गंज चढल्याचे दिसून आले. त्यानंतरच्या काळात मुंबईतील सर्व पुलांसाठी स्टेनलेस स्टीलचा वापर करण्याचा निर्णय मी घेतला, असेही त्यांनी स्पष्ट केले. यापुढे समुद्रकिनारी उभारण्यात येणाऱ्या कोणत्याही स्ट्रक्चरवर खबरदारीचा उपाय म्हणून लोखंडाऐवजी स्टेनलेस स्टीलचा वापर करावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
मालवण : येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने बुधवारी मालवण-राजकोट येथे येऊन पुतळा दुर्घटनेची पाहणी केली. कमोडोर पवन धिंग्रा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता विकास रामगुडे, आयआयटीचे प्रा. जांगिड, प्रा. परिदा यांचा समावेश आहे.