नवी मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबई एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारात गेल्या तीन दिवसांपासून हिरव्या मिरचीची आवक १५ ते २० टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे मिरची घाऊक बाजारात ४० तर किरकोळ बाजारात ५५ ते ६० रुपये किलोपर्यंत कडाडली आहे. आणखी १५ दिवस हिरव्या मिरचीचे दर चढेच राहणार आहेत.
मुंबईत गुजरातमधून मोठ्या प्रमाणावर हिरव्या मिरचीची आवक होते. त्याखालोखाल हैद्राबाद, जालना आणि राज्यातील इतर भागातून मिरची दाखल होत असते. चार महिन्यांपूर्वी मिरचीने किरकोळ बाजारात ८० रुपयेपर्यंत मजल मारली होती. केवळ आवक घटल्याने ही दरवाढ होत आहे, अशी माहिती घाऊक व्यापारी शंकरशेठ पिंगळे यांनी दिली.