पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा, ओबीसी आरक्षणावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांची वेगवेगळी भूमिका असते. हे कॅबिनेट तीन तोंडाच आहे. सरकारच यामध्ये राजकारण करत आहे. सरकारने ठाम निर्णय घ्यावा आम्ही पाठींबा देवू, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले. आज विधानसभा परिसरात ते माध्यमांशी बोलत होते.
विरोधी पक्षाला विश्वासात घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्री मराठा समाजाशी आणि उपमुख्यमंत्री ओबीसी समाजाशी बोलले आहेत, असं समजतं, ते काय बोलले हे आम्हाला सांगायला पाहिजे. गुपचूप बोलण्यापेक्षा आमच्याशी चर्चा करायला पाहिजे. ती न करता आमच्याकडून अपेक्षा कशी करता? सर्वपक्षीय चर्चेच्या नावाखाली विरोधी पक्षाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपले अजेंडा राबवले जातात. अधिवेशनात चर्चा व्हायला पाहिजे होती. सरकारच राजकारण करत आहे. सरकार कोणता निर्णय घेत आहे हे आम्हाला कळायला पाहिजे, असे दानवे म्हणाले.