![राज्यात चारा डेपो उभारण्यास शासनाची परवानगी: राधाकृष्ण विखे- पाटील](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F12%2F%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील अनेक भागात पावसाचे आगमन झाले असले, तरी अनेक विभागात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे राज्यातील 1245 महसुली मंडळात चारा डेपो उभारण्यास शासनाने परवानगी दिल्याची माहिती राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून राज्यात विविध ठिकाणी पावसाला सुरवात झाली आहे. असे असले तरी पावसाचे प्रमाण अद्यापही समाधानकारक नसल्याने अनेक गावांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहे. सध्या राज्यात 512.58 लाख मॅट्रिक टन हिरवा चारा तर 144.55 लाख मॅट्रिक टन सुका चारा उपलब्ध आहे. हा चारा जून अखेरपर्यंत पुरेल, असा अंदाज शासनाकडून व्यक्त केला आहे.
चाऱ्याचे प्रमाण कमी होत असताना शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना जनावरांचे पालन पोषण करताना येणाऱ्या अडचणी कमी व्हाव्यात, म्हणून 31 ऑगस्टपर्यंत किंवा पावसाचे प्रमाण समाधानकारक होईपर्यंत दुष्काळ सदृष्य भागात चारा डेपो उभारून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी महसूलमंत्र्यांनी केली होती.
नुकत्याच पार पडलेल्या पर्जन्यमान आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याला मान्यता देऊन शासन निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चारा डेपो संदर्भात शासनाने शासन निर्णय जाहीर करत चारा डेपो उभारण्यास परवानगी दिली आहे.
हेही वाचा