

नवी मुंबई : मी देखील बिबट्या आणि हरणाची पिल्ले पाळली होती. परंतु वनमंत्री झाल्यावर ही बाब कायदेशीर नाही म्हणून मी त्यांना सोडून दिले, असे वक्तव्य वनमंत्री गणेश नाईक यांनी वाशी येथील खाटीक समाजाच्या मेळाव्यात केले होते. ते आता त्यांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. त्यांच्या या वक्तव्याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी दिला आहे.
पाटकर म्हणाले, बिबट्याची पिल्ले आणि हरण पाळणे हा गुन्हा असून मंत्री नाईक यांनी याबाबतची माहिती पोलिसांना किंवा वनविभागाला देणे आवश्यक होते. परंतु त्यांनी तसे न करता वन्यजीव स्वतःकडे ठेवून त्यांचे पालन-पोषण केले. ही बाब गंभीर आहे. त्यांना ही पिल्ले कुणी आणून दिली आणि सध्या ती कुठे आहेत, याचा तपास होणे अत्यावश्यक आहे, असेही ते म्हणाले.
माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. मला विचारले असते तर मी याबद्दल सविस्तर माहिती दिली असती. माझे वक्तव्य हे केवळ वन्य प्राण्यांबद्दल असलेले प्रेम आणि जिव्हाळ्याचे उदाहरण म्हणून होते. वन्य प्राण्यांची शिकार कोणीही करू नये. त्यांना पाळू नये. सोडून द्यावे, यासाठी मी उदाहरण दिले होते. अनेक वेळा शेतात वन्य प्राणी येतात. काही जखमी असतात. अशा वेळेस प्राण्यांवर दयाभाव दाखवून त्यांना रेस्क्यू सेंटरमध्ये सोडून द्यावे. प्राण्यांची योग्य जागा नैसर्गिक अधिवास आहे. माझ्याकडे कधीही कोणत्याही प्रकारे वन्य प्राणी बेकायदेशीररीत्या ठेवले नव्हते. वन्य प्राणी जंगलातच सुरक्षित असतात.
गणेश नाईक, वनमंत्री