

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक म्हणून उभारण्यात आलेली उरलेली शेवटची 44 स्मारके सुरक्षा दलांनी यशस्वीरित्या उद्ध्वस्त केली. याबद्दल गडचिरोलीतील धैर्यशील पोलीस दलाचे मनापासून अभिनंदन करतो. त्यांची ही कारवाई केवळ भौतिक संरचना हटवण्यापुरती मर्यादित नसून, अनेक वर्षे जनतेच्या मनावर निर्माण झालेल्या भीतीच्या मानसिकतेवर लोकशाहीने मिळवलेला निर्णायक विजय आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
शासनाच्या सातत्यपूर्ण आणि ठाम माओवादविरोधी धोरणामुळे गडचिरोलीतील परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. सुरक्षा कारवाया, आत्मसमर्पण धोरण, विकास प्रकल्प आणि स्थानिक जनतेचा विश्वास वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दल, सी-60 कमांडो, सीआरपीएफ आणि विशेष पथकांच्या संयुक्त मोहिमेत 800 जवानांनी नियोजनबद्ध शोध आणि तपासणी मोहीम राबवली. बीडीडीएस पथकाच्या तपासणीनंतर विविध जंगल परिसरातील ही 44 स्मारके नेस्तनाबूत केली. भीतीपासून विश्वासाकडे, हिंसेपासून विकासाकडे होणाऱ्या संक्रमणाचा हा निर्णायक टप्पा आहे, असेही ते म्हणाले.
सुरक्षा दलांनी धडक कारवाई करत माओवाद्यांनी उभारलेली स्मारके हटविण्याची कारवाई सुरू केली आहे. यासंदर्भात सोशल मीडियात पोस्ट करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माओवाद्यांकडून दुर्गम आणि अतिदुर्गम भागात ही स्मारके उभारली गेली होती. स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे आणि आपले अस्तित्व दाखवण्याच्या उद्देशाने ही स्मारके उभी केली गेली होती.