

मुंबई : अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या तीन नियमित फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही राज्यातील ४ लाख १४ हजार ४४४ विद्यार्थी अद्याप प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्याने आता २९ जूनपासून सुरू होणारी ‘ओपन टू ऑल’ (विशेष फेरी-१) हीच प्रवेशाची मोठी संधी ठरणार आहे.
तिसऱ्या नियमित फेरीसाठी राज्यात अर्ज लॉक केलेल्या ५ लाख ६४ हजार ३०० विद्यार्थ्यांपैकी केवळ १ लाख ४९ हजार ८५६ विद्यार्थ्यांनी २५ जूनपर्यंत प्रवेश निश्चित केला आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील ९ हजार ६४९ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत १४ लाख ३७ हजार ६५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ७ लाख ३५ हजार ९५८ विद्यार्थ्यांनी विविध फेऱ्यांमधून प्रवेश निश्चित केला आहे.
तिसऱ्या नियमित फेरीत ५ लाख ६४ हजार ३०० विद्यार्थ्यांनी भाग-१ व भाग-२ अर्ज लॉक केले होते. त्यापैकी १ लाख ८१ हजार ९३१ विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांचे अलॉटमेंट मिळाले. मात्र, त्यातीलही १ लाख ४९ हजार ८५६ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला. म्हणजेच सुमारे ३२ हजार विद्यार्थ्यांनी अलॉटमेंट मिळूनही प्रवेश घेतलेला नाही. या रिक्त झालेल्या जागांसह इतर उपलब्ध जागांवर आता 'ओपन टू ऑल' फेरीत प्रवेश दिला जाणार आहे.
या विशेष फेरीत विद्यार्थ्यांना पूर्वीच्या पसंतीक्रमाचे बंधन राहणार नाही.
उपलब्ध रिक्त जागांनुसार कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयासाठी अर्ज करता येणार असल्याने पसंतीचे महाविद्यालय न मिळालेल्या तसेच अद्याप प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही फेरी निर्णायक मानली जाते.
विद्यार्थ्यांनी रिक्त जागांची यादी, कटऑफ आणि प्रवेशाचे वेळापत्रक यावर बारकाईने लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.