

Virar Arnala beach drowning
विरार : विरार : लाटांच्या जोरदार तडाख्यात विरारच्या अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर दहा ते बारा वर्षे वयोगटातील चार अल्पवयीन मुले समुद्रात बुडाली. त्यातील दोघांना वाचवण्यात यश आले असून दोघे बेपत्ता आहेत. आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडली.
आज सकाळी चार मुले समुद्राच्या दिशेने जात होती. किनाऱ्यावर गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्यांना समुद्रात उतरू नये असे सांगितले. मात्र गस्त घालणारे पथक तिथून गेल्यानंतर मुले समुद्रात उतरली. काही वेळाने लाटांच्या जोरदार तडाख्यात चौघेही वाहून गेली. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन मुलांना बाहेर काढले. तर दोघेजण अद्याप बेपत्ता आहेत.
मुंबईकरांची पुन्हा चिंता वाढली!
पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्यामुळे तलावांतील पाणीसाठ्यात घट होऊ लागली. गेल्या २४ तासांत १११ दशलक्ष लिटर्सने घट झाली आहे. अजून पाणी घटण्याचे प्रमाण टप्प्याटप्प्याने वाढणार असल्यामुळे मुंबईकरांची पुन्हा चिंता वाढली आहे. तलावांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे मुंबईत सुरू असलेली पाणीकपात रद्द होऊन, टंचाईपासून मुंबईकरांची सुटका होईल, असे वाटत होते.
पण त्यानंतर पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्यामुळे तलावांत साठलेल्या पाण्यामध्ये आता घट होऊ लागली आहे. सध्या ही घट कमी दिसत असली तरी पाऊस लांबल्यास यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. १३ जुलैला तलावांमध्ये ७ लाख २२ हजार ६४९ दशलक्ष लिटर इतका साठा होता. १४ जुलैला सकाळी ६ वाजता तलावांतील आढावा घेतला असता, हा पाणीसाठा ७ लाख २२ हजार ५३८ दशलक्ष लिटर इतका होता. म्हणजेच सुमारे १११ दशलक्ष लिटरची घट झाली आहे.