

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत सुरू केलेल्या विशेष तपासणी मोहिमेत ४ ते ६ ऑगस्ट या तीनच दिवसांत मुंबईतील तब्बल ६३ रेस्टॉरंटची झाडाझडती घेतली.
यापैकी ३८ रेस्टॉरंट्सना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांना स्वच्छतेसह अन्न सुरक्षेचे नियम तत्काळ अमलात आणण्यास बजावण्यात आले आहे. याशिवाय ७ रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
एफडीएच्या पथकांनी मुंबई आणि नवी मुंबईत एकाच वेळी अनेक रेस्टॉरंट्सवर छापे टाकले. आता या झाडाझडतीची व्याप्ती वाढली असून मुंबईसह राज्यभरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ढाबे कचाट्यात सापडले आहेत.
मुंबईलगतच्या पालघर, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही एफडीएने संशयित व नियमबाह्य दुग्धजन्य पदार्थांविरोधात कारवाई केली. या कारवाईत लो-फॅट पनीर व संशयित पनीरचा साठा जप्त करून नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
राज्यात विविध जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले असून, बीडमध्ये तब्बल १ कोटी १४ लाख ५० हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत संबंधित पाच आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले.
बीड जिल्ह्यात खाद्यतेल उत्पादन व रिफायनिंग करणाऱ्या पाच आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यावेळी ११ लाख ११ हजार १७८ किलो खाद्यतेल व इतर खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणांतील २७ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
जळगावात ६७ हजार लिटर पाणी जप्त
जळगाव जिल्ह्यातील कारवाईत ६७ हजार ९३० लिटर पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर जप्त करण्यात आले. पाण्याच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाल्याने नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
कोल्हापुरात गूळ, साखर जप्त
कोल्हापूर जिल्ह्यातील भुयेवाडी येथील गूळनिर्मिती केंद्रावर कारवाई करून ८५० किलो गूळ आणि ५०० किलो व्हाइट क्रिस्टल शुगर जप्त करण्यात आली.
छाप्यात काय आढळले
कुजलेले चिकन, बुरशी लागलेले मांस, मुदत संपलेले दूध आणि दही तसेच मुदत संपलेले अन्नपदार्थ.
अनेक किचन्सची स्वच्छतेशी गाठभेटच नसल्याचे दिसले.अन्नसाठा अयोग्य पद्धतीने करण्यात आला, अन्नपदार्थांची हाताळणीही दूषित, भाज्यांना बुरशी लागलेली आढळली.