

मुंबई: व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बनावट, खोटी किंवा चुकीची कागदपत्रे सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश तात्काळ रद्द केला जाणार असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाईही होणार आहे. याबाबत सीईटी कक्षाने सर्व प्रवेश देणाऱ्या संस्थांना कडक निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षामार्फत विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. या प्रक्रियेत विद्यार्थी अनाथ, संरक्षण दल, दिव्यांग, अल्पसंख्याक आदी विविध आरक्षण प्रवर्गांचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करतात.
या कागदपत्रांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून महाविद्यालयांमध्ये जागांचे वाटप केले जाते. मात्र प्रवेश प्रक्रियेदरम्यान किंवा त्यानंतर कोणत्याही टप्प्यावर संबंधित विद्यार्थ्याने सादर केलेली कागदपत्रे चुकीची, खोटी, बनावट अथवा दिशाभूल करणारी असल्याचे तपासणी किंवा पडताळणीत आढळल्यास त्याचा प्रवेश तत्काळ रद्द करण्यात येणार आहे.
याशिवाय संबंधित विद्यार्थ्याविरुद्ध प्रचलित नियमांनुसार कायदेशीर कारवाईही करण्यात येईल, असे सीईटी कक्षाने स्पष्टकेले आहे.
सीईटी कक्षाने प्रवेश देणाऱ्या संस्थांनाही स्पष्ट जबाबदारी निश्चित करून दिली आहे. जागा वाटप झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित करण्यापूर्वी त्याच्याकडील मूळ कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
कोणत्याही प्रकारची पडताळणी न करता प्रवेश निश्चित केल्याचे आढळल्यास संबंधित संस्थेविरुद्धही कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वैध कागदपत्रेच सादर करावीत अशा सूचना सीईटी कक्षाने दिल्या आहेत.