

मुंबई : शेलू (जि. रायगड) येथील गिरणी कामगार गृहनिर्माण योजनेचे 1 मे रोजी भूमिपुजन करु, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. गिरणी कामगार कृती संघटनेच्या शिष्टमंडळाने विधानभवनात त्यांच्या दालनात फडणवीस यांची भेट घेतली, अशी माहिती संघटनेचे प्रविण घाग यांनी दिली.
या वेळी प्रविण घाग म्हणाले, गेले कित्येक वर्षे गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न प्रलंबित आहे. हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहनिर्माण विभागाचे सचिवांना अनेक निवेदने व शासन दरबारी अर्ज दिले होते. शिष्टमंडळात पत्रकार जयश्री खाडिलकर, जयप्रकाश भिलारे, नंदू पारकर यांचा समावेश होता.
मुंबई महानगर प्रदेशातील गिरणी कामगार घरकुल योजनेसाठी सरकारने काढलेल्या 15 मार्च2024 च्या शासन निर्णयानूसार तातडीने घर बांधणीला सुरुवात करावी व त्याचे भूमिपूजन आपल्या हस्ते करावे, अशी विनंती शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांना केली.
केंद्र व राज्यसरकारच्या विविध विविध योजना अंतर्गत गिरणी कामगार घरकुल योजनेला अतिरिक्त अनुदान देऊन घरांच्या किमती कमी कराव्यात, यासाठी आढावा बैठक घ्यावी असे अनेक मुद्दे मुख्यमंत्र्यांकडे मांडले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतले.