

मुंबई : पीक अवर्सदरम्यान लांब पल्ल्याच्या मेल/एक्सप्रेस गाड्यांना थेट मुंबई उपनगरात प्रवेश न देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या गाड्यांना टिटवाळा, आसनगावसारख्या स्थानकांपूर्वीच थांबवण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेत लोकल सेवा अधिक शिस्तबद्ध आणि वेळेवर होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना काहीसा विलंब सहन करावा लागणार असला तरी दररोज लाखो लोकल प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाणे-सीएसएमटी या अत्यंत गर्दीच्या मार्गावर दररोज पीक अवर्सदरम्यान प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. सकाळी ऑफिसच्या वेळेत लोकल गाड्या जर थोड्याही उशिराने धावल्या तर त्यानंतरची परिस्थिती ही आणखी बिकट होते.
उत्तर भारतातून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकाचा थेट परिणाम अनेकदा मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकल सेवेवर होताना दिसतो. त्यामुळे एखादी एक्सप्रेस गाडी उपनगरातील स्थानकाजवळून जात असताना सुरक्षिततेच्या कारणास्तव लोकल गाड्यांना सिग्नलवर थांबवावे लागते.
याचा सर्वाधिक फटका सकाळी कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाला बसतो. लोकल उशिराने आल्यामुळे डब्यांमध्ये प्रचंड गर्दी होते आणि प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. अनेक वेळा लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावल्याने संपूर्ण वेळापत्रकच कोलमडते.
पीक अवर्समध्ये एक्सप्रेसला उपनगराबाहेरच थांबा
या सर्व गोष्टींचा विचार करून या समस्येवर उपाय म्हणून मध्य रेल्वेने पीक अवर्सदरम्यान लांब पल्ल्याच्या मेल/एक्सप्रेस गाड्यांना थेट मुंबई उपनगरात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना टिटवाळा, आसनगावसारख्या स्थानकांपूर्वीच थांबवण्यात येणार आहे.
थंडी आणि धुक्यामुळे होणाऱ्या विलंबावर तोडगा
लांब पल्ल्याच्या गाड्या पहाटे 5 वाजण्यापूर्वी मुंबई उपनगरात दाखल होणे अपेक्षित असते. मात्र हिवाळ्यात उत्तर भारतात दाट धुके पडल्यामुळे या गाड्या अनेकदा 4 ते 5 तास उशिराने धावतात. त्यामुळे त्या थेट पीक अवर्समध्ये मुंबईत पोहोचतात आणि लोकल सेवेत मोठा खोळंबा होतो.