

मुंबई : घरगुती तसेच औद्योगिक वीज दर टप्प्याटप्प्याने पुढील पाच वर्षांत कमी करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी केली. घरगुती वापराचे 100 युनिटपर्यंतचे वीज दर पुढील पाच वर्षांत 26 टक्क्यांपर्यंत कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात विजेचे दर अधिक असल्याबद्दल उद्योजकांच्या संघटनांकडून चिंता व्यक्त केली जात असते. विशेषत: शेजारील गुजरात, कर्नाटकमध्ये राज्याच्या तुलनेत वीज दर कमी असल्याने उद्योजक शेजारील राज्यांना पसंती देत असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज दरात कपात करण्याची घोषणा केली. पुढील पाच वर्षांत घरगुती वापराच्या विजेचे दर हे 26 टक्के कमी होणार आहेत. त्याची सुरुवात या वर्षापासून होईल. 100 युनिटपर्यंतच्या वीज वापरासाठी दर 26 टक्के कमी होतील. 300 युनिटपर्यंत पाच टक्के दर कमी होतील. औद्योगिक ग्राहकांसाठी वीज दरात प्रति युनिटला 2 रुपये 17 पैशांची सूट दिली जाईल, असे फडणवीस यांनी जाहीर केले.
मागेल त्याला सौर पंप योजनेत महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. प्रतिदिन 1 हजार 500 पंप देण्यात येत आहेत. या योजनेमुळे 40 लाख एकर जमीन ओलिताखाली आणण्यात यश मिळाले असून, दहा लाख 25 हजार शेतकरी या योजनेचे लाभार्थी झाले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. या शेतकर्यांना दिवसा वीज मिळत आहे. राज्यातील 46 लाख कृषी ग्राहकांपैकी 33 लाख कृषी ग्राहकांना आपण दिवसा वीजपुरवठा करू शकलो आहोत, असे फडणवीस म्हणाले.
85 हजार कोटी करून वीज व्यवस्थेत सुधारणांची कामे हाती
66 हजार कोटींची वीज बचत होणार आहे या कामांतून
2013-2014 मध्ये 1 लाख 55 हजार कोटी होती महसुली जमा
06 लाख 16 हजार कोटी रुपयांवर पोहोचली आता महसुली जमा
81 लाख हेक्टर आहे अंतिम सिंचन क्षमता जलआराखड्यानुसार
7 लाख हेक्टर म्हणजेच 70 टक्के सिंचन क्षमता तयार केली राज्यात
78 टीएमसी पाणी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात नेणार नदीजोड प्रकल्पातून