

मुंबई : कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाच्या जलाशय पातळीची उंची वाढविल्यास महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांसह कृष्णा नदीकाठच्या परिसराला फटका बसू शकतो. त्यामुळे अलमट्टीची उंची वाढवू नये, यासाठी कर्नाटक सरकारला निर्देश द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना केली आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विस्तृत पत्र पाठविले आहे.
या पत्रात अलमट्टी धरणाचे बॅकवॉटर, नदीमधील गाळ साचणे, बंधार्यांचे बांधकाम यामुळे निर्माण होणार्या पूरस्थितीबाबतही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या परिसरातील नागरिकांच्या व्यथा मांडल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने अलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरमुळे निर्माण होणार्या पूरस्थितीबाबत सिम्युलेशन आणि हायड्रॉनॉमिक्स पद्धतीने अभ्यास करण्याचे काम रुरकीच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी यांच्याकडे सोपविले आहे. या अभ्यासातून पूरस्थितीबाबतची साद्यंत माहिती समजून घेता येणार आहे. याबाबतच अहवाल अजून प्राप्त झालेला नाही. तोवर या धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय विवेकी ठरणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.
कर्नाटक सरकारचा अलमट्टी जलाशयाची उंची 519 मीटरवरून 525 करण्याचा निर्णय आमच्यासाठी अत्यंत चिंताजनक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रात नमूद केले आहे. अशी उंची वाढविली गेल्यास सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षीच्या पूरस्थितीत आणि त्यामुळे नागरिकांच्या हालअपेष्टांमध्ये भर घालण्यासारखेच होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
अलमट्टी धरणाची जलाशय पातळी सहा मीटरने वाढविण्याचा कर्नाटक शासनाचा निर्णय आहे. यामुळे कृष्णा नदीतही या काळात सातत्याने सहा मीटर पाणी थांबणार आहे. यामुळे पूरस्थिती आणखी गंभीर आणि भयावह होईल. यातून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो नागरिकांना, तसेच पिकाऊ शेत जमिनीला फटका बसणार आहे. या सर्वांचा विचार करता दोन्ही राज्यातील कृष्णा नदीकाठच्या गावांचा आणि नागरिकांच्या हितासाठी त्यांच्या जीविताचे, मालमत्तेचे आणि उदरनिर्वाह साधनांच्या रक्षणाचा उपाय म्हणून अलमट्टी धरणाच्या उंची वाढविण्याच्या निर्णयाचा कर्नाटकने पुनर्विचार करावा, याकरिता त्यांना निर्देश देण्यात यावेत, अशी विनंतीही फडणवीस यांनी केली आहे.
अलमट्टी धरणाच्या पाण्यामुळे कृष्णा नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पात्रात गाळ साचण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा परिणाम नद्यांच्या पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेवर झाला आहे. यामुळे पुराचे पाणी ओसरण्याची गती संथ झाली आहे. याशिवाय बंधार्यामध्येही मोठ्या प्रमाणात गाळ साचू लागला आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.