

Disha Salian case: दिशा सालियान प्रकरण गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे नाव सातत्यानं घेतलं जात आहे. त्यावर आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून स्पष्टीकरण दिलं होतं. त्यानंतर आता दिशाचे वडील सतीश सालियान यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढलं आहे.
दिशाच्या वडिलांनी प्रसिद्धीपत्रकात १२ मुद्दे मांडले असून शेवटी त्यांनी चला वाट पाहूया आणि तुमच्या कर्मांचे फळ आता तुमच्यासमोर आले आहे सत्य मेव जयते असं लिहिलं आहे.
1. दिशावरील गैंगरेप आणि हत्या तसेच त्यानंतर करण्यात आलेल्या कवर-अपमधील मुख्य अपराधी आदित्य ठाकरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकात दावा केला की ते दिशा सालियनला ओळखत नव्हते आणि त्यांच्यावरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित असून त्यांची बदनामी करण्यासाठी करण्यात आले होते.
2. हे विधान प्रथमदर्शनी खोटे आणि दिशाभूल करणारे आहे. सर्वप्रथम, आदित्य ठाकरे यांनी सतीश सालियन यांच्या याचिकेत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातही हीच भूमिका घेतली होती आणि एफआयआर नोंदविण्यास तसेच सीबीआयमार्फत तपास करण्यास आक्षेप घेतला होता. तथापि, माननीय उच्च न्यायालयाने दिनांक 02.09.2026 रोजीच्या आदेशाद्वारे त्यांचा आक्षेप फेटाळून लावला.
3. दुसरे म्हणजे, आदित्य ठाकरे यांनी माननीय उच्च न्यायालयासमोर शपथेवर खोटे विधान केले होते की दिशाचे प्रकरण यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात गेले होते आणि सीबीआयने त्याचा तपास केला होता. त्यामुळे उच्च न्यायालय या प्रकरणाची सुनावणी करू शकत नाही, असा त्यांचा दावा होता. माननीय उच्च न्यायालयाने सीबीआयकडून याची पडताळणी करून घेतली आणि हे विधान खोटे असल्याचे आढळले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी माननीय उच्च न्यायालयासमोर माफी मागितली.
4. तिसरे म्हणजे, आदित्य ठाकरे यांनी यापूर्वी रिया चक्रवर्तीला ओळखत नसल्याचे म्हटले होते. एनसीबी, मुंबईने गुन्हा क्रमांक 15/2020 च्या तपासादरम्यान हस्तगत केलेल्या चॅटमधून त्यांचे हे विधानही खोटे ठरले आहे.
5. चौथे म्हणजे, त्यांच्या गुन्हेगारी कारवायांशी संबंधित सर्व भौतिक पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. याशिवाय, गुन्ह्याच्या ठिकाणी त्यांचे मोबाइल टॉवर लोकेशन असल्याच्या विशिष्ट आरोपांचा किंवा गुन्हा क्रमांक 15/2020 मधील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अहवालाचा आदित्य ठाकरे यांनी कधीही इन्कार केलेला नाही. यामध्ये आदित्य ठाकरे अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी होते आणि ते स्वतःही हायड्रोपोनिक वीडसह अंमली पदार्थांचे सेवन करत होते, असा आरोप असलेल्या फोन सर्व्हेलन्स रेकॉर्डचाही समावेश आहे.
6. आदित्य ठाकरे यांनी यापूर्वी असा खोटा पवित्रा घेतला होता की 08.06.2020 रोजी, ज्या दिवशी दिशाचा मृत्यू झाला, त्या दिवशी ते मुंबईबाहेर होते कारण त्याच दिवशी त्यांचे आजोबा श्री पाटणकर यांचे निधन झाले होते. हा दावाही खोटा ठरला कारण श्री पाटणकर 14.06.2020 पर्यंत जिवंत होते.
7. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय लिटिगंट्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री राशिद खान पठाण यांच्या वतीने अधिवक्ता चैतन्य राऊत यांनी अशाच स्वरूपाच्या आरोपांबाबत दिनांक 21.10.2023 रोजी पाठविलेल्या मानहानीच्या नोटिशीला आदित्य ठाकरे यांनी आजपर्यंत उत्तर दिलेले नाही.
8. या सराईत खोटारड्या आणि अपराध्याने आपल्या मुलीसाठी न्याय मागणाऱ्या दुःखी वडिलांवर दोषारोप करण्याचे धाडस केले आहे आणि प्रामाणिक माध्यम संस्थांना धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची कारस्थाने यशस्वी होणार नाहीत.
9. माध्यमांच्या सक्रिय हस्तक्षेपामुळेच हे प्रकरण पुन्हा उघडू शकले, हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे माध्यमांमधील चर्चेला घेतलेला आक्षेप दुर्भावनापूर्ण आहे.
10. माध्यमांकडून होणारी सखोल छाननी आणि जनतेचे लक्ष यामुळे व्यवस्थेवर प्रभाव टाकणे किंवा त्यात फेरफार करणे तसेच उत्तरदायित्व किंवा शिक्षेपासून बचाव करणे कठीण होईल, अशी भीती आदित्य ठाकरे यांना वाटत असल्याचे दिसते. यापूर्वी त्यांनी इतर प्रकरणांमध्ये असेच यशस्वीपणे केले आहे. त्यामध्ये सुशांत सिंह राजपूत यांच्या हत्येशी संबंधित परिस्थिती, त्यांची अंमली पदार्थांची तस्करी आणि इतर गुन्हेगारी कारवायांचाही समावेश आहे.
11. कदाचित खरी चिंता “माध्यमांचा हस्तक्षेप” ही नाही. यावेळी प्रत्येक घडामोडीकडे सार्वजनिकरीत्या लक्ष ठेवले जात आहे, त्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, तिची छाननी केली जात आहे आणि ती नोंदविली जात आहे, हीच खरी चिंता आहे.
12. जनतेकडून होणारी छाननी निष्पक्ष तपासात अडथळा आणत नाही. उलट, ती तपास भरकटविण्याचे प्रयत्न अधिक कठीण बनवते.
चला, वाट पाहूया आणि पाहूया. तुमच्या कर्मांचे फळ आता तुमच्यासमोर आले आहे.
सत्यमेव जयते