मुंबई; पुढारी वृत्तसेवा : माजी नगरसेवक आणि शिवसेना ठाकरे गटाचे अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबाराची घटना अतिशय दुर्दैवी आहे. वैयक्तिक वैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात देण्यात आलेल्या शस्त्र परवान्यांची चौकशी केली जाईल. नागरिकांकडे अवैध मार्गाने बंदुका येत असतील तर त्याचीही चौकशी केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.
अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू झाला. त्यानंतर कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी विरोधकांची राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली. एखाद्या गाडीखाली श्वान आले तरी ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील, अशी विरोधी पक्षांची स्थिती आहे. त्यात घोसाळकरांबाबतची घटना गंभीर आणि दुर्दैवी आहे. त्यामुळे राजीनामा मागितला म्हणून मला आश्चर्य वाटत नाही. परंतु, विरोधी पक्षालाही ही हत्या का झाली, याचे कारण माहीत आहे, असे फडणवीस म्हणाले. घोसाळकर यांच्याबाबत घडलेल्या घटनेची चौकशी सुरू आहे. अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्या योग्यवेळी उघड करण्यात येतील, असे ते म्हणाले.