

दादर : निलेश साठे
स्वयंपाकघरातील अविभाज्य घटक मानला जाणाऱ्या कढीपत्त्याची आवक घटल्याने तो बाजारातूनच गायब झाला आहे. तास दोन तासांत माल संपत असल्याने ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. परिणामी पाच-दहा रुपयांत मिळणारी जुडी आता 30 ते 40 रुपयांवर गेली आहे.
विशेषतः दादर, नायगाव, माटुंगा परिसरातील भाजी मार्केटमध्ये कढीपत्त्याची आवक घटल्याने ग्राहकांना तो मिळवण्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे. व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, कर्नाटक आणि कोकण पट्ट्यातून मोठ्या प्रमाणावर कढीपत्ता मुंबईत दाखल होतो. मात्र गेल्या काही दिवसांतील हवामानातील बदल, अवकाळी पाऊस आणि वाहतुकीतील अडचणी यामुळे आवक एकदम रोडावली आहे.
परिणामी दरात 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. पूर्वी 10 ते 20 रुपयांत मिळणारी कढीपत्त्याची जुडी आता 30 ते 40 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, सध्या मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने दर वाढले आहेत. काही ठिकाणी तर सकाळी आलेला माल काही तासांत संपत आहे. त्यामुळे उशिरा येणाऱ्या ग्राहकांना कढीपत्ता मिळत नाही. दरम्यान आवक पूर्ववत झाल्यानंतर दर स्थिर होतील. तोपर्यंत मात्र ग्राहकांना वाढीव दराचा फटका सहन करावा लागणार आहे.
गृहिणींच्या मते, कढीपत्ता हा रोजच्या फोडणीसाठी आवश्यक असल्याने त्याशिवाय चव पूर्ण होत नाही. कढीपत्ता नसल्याने आमटी, पोहे, उपमा यांची चव कमी भासते. त्यामुळे दर वाढले तरी घ्यावाच लागतो. मात्र तो बाजारात आता मिळत नाही.