पुढारी ऑनलाईन डेस्क : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाहने कबुलीनामा दिला आहे. अपघाता दरम्यान मी गाडी चालवत असल्याचे त्याने मान्य केले आहे. कावेरी नाखवा (वय ४५) असे या अपघातातील मृत महिलेचे नाव आहे. हा अपघात सोमवारी (दि.८) पहाटे घडला. Mumbai BMW Hit and Run
मुंबईतील वरळीतील अॅट्रीया मॉलजवळ सोमवारी (दि.८) पहाटे दुचाकीवरुन जाणाऱ्या दाम्पत्याला कारने पाठीमागुन धडक दिली. दुचाकीवरील महिलेला साधारणपणे तीन किलोमीटर फरपटत नेले. यात कावेरी नाखवा (वय ४५, वरळी कोळीवाडा) महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या पतीने दुचाकीवरुन उडी मारल्याने त्यांचा जीव वाचला.
या अपघातातील कार ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे उपनेते, पालघरमधील राजेश शाह यांची असुन, अपघाता दरम्यान कारमध्ये राजेश शाह यांचा मुलगा मिहिर शाह आणि कारचालक होता. अपघातानंतर कार चालक आणि मिहिर शाह याला पोलिसांनी अटक केले. तर मिहिर शाह आणि कारचालकावर गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राजेश शहा (Rajesh Shah) यांना जामीन मंजूर झाला आहे.
वरळी हिट अँड रन प्रकरणातील फरार आरोपी मिहिर शहाला ७२ तासांनंतर मंगळवारी अटक करण्यात आली. अपघातानंतर तो फरार झाला होता. मिहिर देश सोडून जाऊ नये, म्हणून पोलिसांनी लुकआउट नोटीसही जारी केली होती. दरम्यान त्याने आज (दि.१०) पोलिसांना जबाब दिला आहे की, अपघाता दरम्यान मी गाडी चालवत होते. पुढील तपास करीत आहेत.
वरळी हिट अँड रन प्रकरणात उत्पादन शुल्क विभागानेही कारवाई केली आहे. जुहूच्या व्हाईस ग्लोबल तापस बारला उत्पादन शुल्क विभागाने सील ठोकले आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर बार सील करण्यात आल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या सूत्रांनी सांगितले. वरळी दुर्घटनेतील पहिला आरोपी मिहीर शहा याने त्याच्या चार मित्रांसोबत जुहू येथील व्हाईस गोलबल तापस बारमध्ये पार्टी केली होती.