

नेरुळ : गेल्या आठवड्यापासून वातावरणातील गारठा वाढल्याने ताज्या मासळीची आवक घटली आहे.परिणामी, मासळीचे भाव देखील वाढले आहेत.
नवी मुंबईतील बहुतांश मच्छीमार हे मुंबई येथील भाऊचा धक्का व कुलाबा येथून ताजी मासळी खरेदी करतात.मात्र त्या मासळीची देखील आवक कमी झाल्याने त्यांनाही भाववाढीचा फटका बसला आहे. दिवाळे खाडीपासून ते ऐरोली खाडीपर्यंत स्थानिक मच्छीमार मासेमारी करतात .या खाडीतून मासे, निवटी, बोईस, कोलंबी तसेच चिवणी मिळतात, पण गारठा वाढल्याने त्यांची देखील आवक खूपच कमी झाली आहे.
सध्या वातावरणातील गारव्यामुळे उष्णतेच्या शोधात मासे समुद्राच्या तळाला जाऊ लागले आहेत. त्यामुळे मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना आवश्यक त्या प्रमाणात मासळी मिळत नसल्याने कधी- कधी रिकाम्या हाती परतावे लागते. उन्ह वाढले की जाळ्यात मासळी सापडली जाते.
समुद्रातील वाढते प्रदूषण आणि बदलत्या वातावरणामुळे अनेक प्रकारचे मासे गायब होऊ लागले आहेत. पापलेट, सुरमई, घोळ आणि इतर अनेक प्रजातीचे मासे मिळेनासे झाले आहेत. मांदेली आणि बोंबील, बांगडे हे सर्वसामान्य खवय्यांच्या पसंतीचे व परवडणारे मासेही महाग झाले आहेत.
नवी मुंबईतील घातक रासायनिक सांडपाणी खाडीद्वारे समुद्रात सोडले जाते.त्यामुळे होत असलेल्या प्रदूषणामुळे मासे कमी मिळत आहेत. त्यात वातावरणातील गारठ्यामुळे उष्णतेच्या शोधात मासे समुद्राच्या तळाला जाऊ लागले आहेत. परिणामी, मासळीची आवक घटली असून दर वाढले आहेत. त्यामुळे मच्छीमारही आर्थिक संकटात सापडले आहेत.
सुरेखा कोळी मासे विक्रेती, दिवाळे