

हिंगणघाट – “देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत ‘लाडकी बहिण’ योजना बंद होणार नाही,” असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगणघाटच्या प्रचार सभेत दिले. अलीकडील विधानसभा विजयानंतर काही ठिकाणी या योजनेबाबत अफवा पसरवल्या जात असल्याचा त्यांनी उल्लेख केला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “काही जण म्हणत होते की आता योजना बंद होईल. पण जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत ही योजना कायम राहणार. उलट आम्ही या योजनेतून प्रत्येक लाडक्या बहिणीला ‘लखपती दीदी’ बनवणार आहोत.”
हिंगणघाट येथील प्रचार सभेत मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. या सभेला राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, भाजप जिल्हाध्यक्ष संजय गाते, माजी खासदार रामदास तडस, सुरेश वाघमारे, विजय आगलावे, भूपेंद्र शहाणे तसेच भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. नयना तुळसकर आणि सिंदी (रेल्वे) नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार राणी कलोडे यांच्या उपस्थितीने उत्साह निर्माण झाला
मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिंगणघाटसाठी सुरू असलेल्या आणि आगामी विकासकामांचीही माहिती दिली.
ते म्हणाले
“प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचवण्याचे काम आपण केलं आहे. आता वाढीव पाणीपुरवठा योजना घेऊन येत आहोत.”
“प्रत्येक शहरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे.”
“हिंगणघाटमध्ये ४०० बेडचे हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज लवकरच सुरू करणार आहोत.”
“महा फुले जनआरोग्य योजनेत पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळत आहेत.”
नदीलगत ब्लू लाईनमध्ये आलेल्या घरांबाबतही त्यांनी नागरिकांना दिलासा दिला. “यासाठी समिती तयार करून घरांची तपासणी केली जाईल. विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
सभेचे संचालन किशोर दिघे यांनी केले, तर आभारप्रदर्शन आकाश पोहाणे यांनी केले. मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती ही सभेची खास वैशिष्ट्य ठरली.