

मुंबई : महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ प्रकल्प उभारणी हा ऐतिहासिक टप्पा आहे. राज्य शासनाने कायदा शिक्षणासाठी दाखविलेली बांधिलकी उल्लेखनीय आहे. महाराष्ट्रात न्यायपालिकेच्या पायाभूत सुविधांचा दर्जा देशात सर्वोत्तमांपैकी एक आहे, असे प्रतिपादन भारताचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले. मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तथा महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, न्यायमूर्ती भारती डांगरे, न्यायमूर्ती संदीप मर्ने, राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. दिलीप उके, लोकप्रतिनिधी, अधिकारी, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने मौल्यवान जागा उपलब्ध करून दिल्याचे नमूद करून हा प्रकल्प केवळ राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय दर्जाचा ठरेल, असा विश्वास मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हे तीन राष्ट्रीय विधी विद्यापीठ असलेले देशातील एकमेव राज्य आहे. मुंबई विद्यापीठाचा अत्याधुनिक प्रकल्प उभारणीसाठीच्या सर्व परवानग्या पूर्ण झाल्या आहेत. हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय स्तरावरील विधी शिक्षणाचे केंद्र बनेल, असे त्यांनी सांगितले.
सर्वोत्तम मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रयत्नशील
आजच्या काळात उद्योग, व्यवसाय, सामाजिक जीवन आणि राजकारण या सर्व क्षेत्रांचा संबंध शिक्षण क्षेत्राशी घट्ट जोडलेला आहे. आज मानवी संपत्ती ही सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. पूर्वी मनुष्यबळ भांडवलाकडे जात असे,आता भांडवल मनुष्यबळाकडे येते. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वोत्तम मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.